गुहागर : शेती व बागायतीसाठी रासायनिक खतां ऐवजी सेंद्रीय खताचा जास्तीत जास्त वापर करावा.

banner 468x60

वृक्ष लागवडीने पर्यावरणाचा समतोल राखून शेतकऱ्यांनी शेती व बागायतीसाठी रासायनिक खतां ऐवजी सेंद्रीय खताचा जास्तीत जास्त वापर करावा.-उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर.

banner 728x90

शेतकरी भरघोष उत्पादन घेण्यासाठी सर्रास खतांचे वापर करतात. परंतु खतांचा वापर करताना रासायनिक खतांच्या वापरांपेक्षा सेंद्रीय, कंपोस्ट आणि गांडूळ खताचा जास्तीत जास्त वापर करावा असे मत गुहागर तालुक्यातील उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी व्यक्त केले आहे.

सरपंच आंबेकर यांनी आपली भुमिका मांडताना असेही म्हटले आहे की, पुर्वी आपल्या पुर्वजांच्या पीढी मध्ये शेणखत किंवा सुकी मासळीचा टाकाऊ भाग (कुटी) खत म्हणून वापरत असत.

त्या काळी रासायनिक खते फारशी वापरात नव्हती. जमिनीचा कसदारपणा नैसर्गिक होता. चांगले पिकपाणी सुद्धा येत होते. शेतकरी कुटुंबे खाऊनपिऊन समाधानी जीवन जगत होती. पुढे काळानुसार परिस्थिती बदलत गेली. नवनवीन शोध संशोधने लागली.

साहजिकच कमी श्रमात अधिक उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी शेतकरी रासायनिक खतांचा वापर करू लागला. उत्पन्न वाढले परंतु जमीनींतील कसदारपणा कमी होऊन पिकपाण्यावर परिणाम दिसू लागल्याने पुन्हा शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे बऱ्यापैकी वळणाचा मार्ग पत्करला.

सद्या आधुनिक तंत्रज्ञान, उपलब्ध नवनवीन यंत्र सामुग्री, अवजारे यांचा वापर तसेच सुधारित बी-बियांने, सेंद्रीय, कंपोस्ट आणि गांडूळ खतांचा वापर शेती, बागायतीसाठी वाढलेला दिसतो आहे. यामुळे जमीनीचा कस नैसर्गिकरीत्या वाढून उत्पन्न सुद्धा चांगले वाढले आहे. हि एक शेती- बागायतीसाठी उर्जा देणारी निश्चितच चांगली बाब आहे.

सेंद्रीय शेतीचे महत्व सांगतांना सरपंच आंबेकर सांगतात की, पुर्वापार शेतकऱ्यांकडे गाई-गुरांनी भरलेले गोठे असायचे. गाई-गुरांना चारायला गुराखी रानमाळावर जंगलात घेऊन जात असत. या जनावरांची विष्ठा तसेच रानटी पशू पक्षी यांंची पडलेली विष्ठा हे एक प्रकारे सेंद्रीय खत तसेच झाडा- झुडपांंचा पालापाचोळा कुजून मिळणारे कंपोस्ट खत. या नैसर्गिक खतांमुळे जंगल जमीन कसदार झाल्याने मोठमोठे वृक्ष व जंगले नैसर्गिकरीत्या वाढलेली दिसतात.झाडे,जंगले यांचे मानवी जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. यांच्यामुळे मिळणारा शुध्द प्राणवायू सजीवांचे तारणहार आहे.

परंतु आपण अनेक गोष्टी विसरतो. सरपनासाठी असेल किंवा अन्य कारणांंसाठी असेल आपण बेसुमार जंगलतोड करतो. परंतु नवीन वृक्ष लागवड त्या मानाने करत नाही. यामुळेच पाणी टंचाईला सामोरे जावे लागते आहे. जमीनींतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पुर्वापार जंगले वाढतात ते नैसर्गिकरीत्या झाडांंची फळे, बीया पडून तसेच पक्षांंच्या विष्ठेतून परागीकरणामुळे झालेली असतात. आपण वृक्षतोड करतो त्या प्रमाणात वृक्ष लागवड करतो का ? आपण एप्रिल – मे महिन्यांत आंबे खातो आणि बाटा उकिरडावर फेकतो. त्याच आंब्याची बाटा, काजू बी किंवा इतर झाडांच्या बीया जमा करून पावसाळ्याच्या सुरूवातीला आपल्या शेताच्या बांधावर, आडीच्या सर्व्यात नेऊन जरी टाकल्या तरी निसर्गावर फार मोठे उपकार होतील.

आपण नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास करतो आहोत. हे कुठेतरी थांबवले पाहिजे. दर वर्षी वृक्ष लागवड करून निसर्गाचा पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. यासाठीच शासनाच्या कृषी विभागिने / वन विभागाने विविध योजना राबविण्यासाठी आणलेल्या आहेत त्यांचा आपण सर्व शेतकर्‍यांनी / बागायतदारांनी पुरेपुर लाभ घेऊन रासायनिक खतां ऐवजी सेंद्रिय खत, कंपोस्ट आणि गांडूळ खतांचा वापर आधुनिक शेती व बागायतीसाठी करून भरघोष उत्पन्नाने आपला देश सुजलाम सुफलाम करूया असे आवाहन गुहागर तालुक्यातील उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सर्व शेतकर्‍यांना केले आहे. – *जनार्दन आंबेकर, सरपंच, ग्रामपंचायत उमराठ*- मोबा. ८७६७४३३८४०.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *