शिवजयंतीनिमित्त मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी गेलेल्या रत्नागिरीतील दहा वर्षीय शाळकरी बालिकेचा चक्कर येऊन पडल्याने गुरुवारी दुपारी दुर्दैवी मृत्यू झाला. अस्मी मनोहर गोविलकर असे या बालिकेचे नाव असून, या घटनेमुळे गोविलकर कुटुंबासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी येथून विद्यार्थी व पालकांचा सुमारे २५ ते ३९ जणांचा गट शिवजयंतीच्या सुट्टीचे औचित्य साधून मालवण येथे सहलीसाठी गेला होता. या सहलीत अस्मी गोविलकर ही आपल्या आईसोबत सहभागी झाली होती. गुरुवारी सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास किल्ल्यावर फिरत असताना कडक उन्हामुळे अस्मीला अचानक चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली.
तिला तातडीने होडीच्या साहाय्याने मालवण किनारी आणून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. अस्मीला लहानपणापासूनच हृदयाचा आजार असल्याची माहिती तिची आई मोहिनी गोविलकर यांनी डॉक्टरांना दिली.
या हृदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, पर्यटनस्थळी उन्हाळ्यातील वाढत्या तापमानात लहान मुले व आजार असलेल्या व्यक्तींसाठी विशेष काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















