महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे असून कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशा विभागात विभागणी केली आहे.
राज्यात 26 जानेवारी रोजी नवीन जिल्ह्यांची घोषणा होणार असून राज्यात 21 जिल्हे प्रस्तावित आहेत, अशा अनेक पोस्ट्स तुम्ही गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर पाहिल्या असतील. या पोस्टमध्ये, मूळ जिल्हा आणि त्यातून निर्माण होणारे नवीन जिल्हे यांची नाव असलेली यादीसुद्धा दिलेली आहे.
काही माध्यमांमध्येही याबाबतच्या बातम्या छापून आल्या आहेत. पण, खरंच महाराष्ट्रात नवीन 21 जिल्हे होणार आहेत का? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हा राज्यात 26 जिल्हे होते. मात्र, वाढती लोकसंख्या आणि गरजा लक्षात घेता जिल्ह्यांचे विभाजन करण्यात आले आणि नवीन जिल्ह्यांची भर पडत गेली.
तसंच, 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला. त्यानंतर पुन्हा एकदा आणखी नवीन जिल्ह्यांचे निर्माण होणार अशी चर्चा सुरू होती. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये जो दावा करण्यात आलाय, त्यामध्ये कितपत तथ्य आहे? जाणून घेऊया.
राज्यात २१ नवीन जिल्हे तयार करण्याचा निर्णय झाला असून याची अधिकृत घोषणा २६ जानेवारी २०२५ रोजी होणार असल्याचे समाज माध्यमातून व्हायरल होत आहे. मात्र या वृत्तात कोणतंही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारचा असा कोणताही निर्णय झाल्याचे वृत्त नाही.
तसेच सरकारकडून याला दुजोराही देण्यात आलेला नाही. 1 ऑगस्ट 2014 रोजी राज्यात पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यानंतर गेल्या 10 वर्षांत एकही नवा जिल्हा अस्तित्वात आलेला नाही.जिल्हा निर्मितीचा विषय मोठा असतो. तसे करायचे असेल तर सरकारकडून त्याबाबतचा प्रस्ताव तयार केला जातो.
त्यासंदर्भात चर्चा केली जाते. मग त्याचा मसूदा प्रसिद्ध केला जातो. त्यावर हरकती मागवल्या जातात. त्या हरकतींवर विचार करुन मग अंतिम नोटिफिकेशन जारी केलं जातं.
त्यानंतर जिल्हा निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात होते. ही बरीच मोठी प्रक्रिया असते. सध्या या प्रक्रियेविषयी कोणतीही चर्चा नाहीये.
तसंच सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणाही करण्यात आलेली नाहीये.
नवीन जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा जिल्हा न्यायालयाच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येण्याची शक्यता आहे.
सध्या शासनाची इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची तयारी नसल्याने अद्याप तरी नवीन जिल्ह्यांचा निर्णय घेण्यात येणार नसल्याचे, जाणकारांचे म्हणणे आहे.
Fact Check सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये काहीही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. शासन स्तरावरून अशी कोणतीही घोषणा अथवा निर्णय झालेला नसून राज्यात काही नवीन जिल्हे प्रस्तावित असून त्याबाबतची माहिती विकीपिडीयावर अनेक वर्षांपासून दिलेली आहे. त्यातून ही माहिती उचलून फेक पोस्ट बनवण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*