Dabhol दाभोळ : दाभोळ ग्रामपंचायतच्या आडमुठे धोरणामुळे गावातील 35 मुलींचं शिक्षण धोक्यात, ग्रामपंचायतचा निर्णय आर्थिक की सामाजिक?

दाभोळ ग्रामस्थ

banner 468x60

राज्यामध्ये शिक्षणासाठी वेगवेगळी पावले पडत असताना जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी नवीन संकल्पना आणली जात असताना दापोली तालुक्यातील दाभोळमधील कन्या शाळा सध्या वादात सापडली आहे.

मुलींच्या शैक्षणिक भवितव्याबाबतही प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाल्याची अनेक उदाहरणे गेल्या पाच वर्षांत समोर आली आहेत. या अनागोंदी कारभारामुळे दाभोळमधील मुलींचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

banner 728x90 banner 728x90

राज्यातील सरकारी शाळांचा कायापालट केला गेल्याचा दावा सरकार स्तरावर केला जातो. पण सरकार कितीही बदलली तरी जिल्हा परिषदांच्या शाळांची दूरवस्था मात्र कायम असल्याचे दिसते. दापोली तालुक्यातील दाभोळ कन्या शाळेचं भीषण वास्तव समोर आलं आहे.

जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की, समोर दिसतं ते चित्र नक्कीच चांगलं नसतं. कारण निधीचा अभाव, मोडकळीला आलेल्या इमारती, सुविधांचा अभाव, कर्मचाऱ्यांची अनास्था. हे चित्र रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सर्वत्र पहायला मिळत असतं. इतकं होऊनही जिल्हा परिषदेची शाळा ही ग्रामीण भागातील शिक्षणाचा मुख्य कणा आहे.

येथेच जर सर्वांगीण शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली तर या भागातील विद्यार्थी नक्कीच उज्वल भवितव्य तयार करू शकतील. मात्र दाभोळ कन्या शाळेमध्ये मुलींच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दाभोळ कन्या शाळेच्या इमारतीची डागडुजी करण्यासाठी उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग यांनी वर्क ऑर्डर काढली आहे मात्र या वर्क ऑर्डरला दाभोळ ग्रामपंचायतने हरकत घेतली आहे.

१८ जानेवारी २०२४ ला सकाळी या वर्क ऑर्डर प्रमाणे कामाला सुरुवात करण्यात आली मात्र दाभोळ ग्रामपंचायत सदस्यांनी या कामाला हरकत घेऊन हे काम बंद पाडलं.

मात्र दाभोळ ग्रामपंचायतच्या या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आमच्या ३५ मुलींचं काय होणार, शाळा बंद करण्याचा हट्टहास दाभोळ ग्रामपंचायतचा का असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. मुलींचं होणारं नुकसान, मुलींची होणारी हेळसांड याला सर्वस्वी जबाबदार दाभोळ ग्रामपंचायत असेल असं दाभोळमधील पालकांचं म्हणणं आहे.

आमची दाभोळ शाळेत पर्यायी व्यवस्था केली तर या शाळेची डागडुजी कधी होणार जरी ग्रामपंचायतच्या हद्दीत असेल तरी जी वर्क ऑर्डर निघाली आहे ती खोटी आहे का असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. शाळेचं काम का करू देत नाही यामध्ये आर्थिक गणित असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याठिकाणी दुसरी खासगी शाळा उभारली जाणार असल्यामुळे दाभोळ ग्रामपंचायत यासाठी हरकत घेत आहे असं पालकांचं म्हणणं आहे.

सरकार जर बेटी बचाव बेटी पढाव चा नारा देत आहेत तर दाभोळ ग्रामपंचायत मुलींच्या शिक्षणासाठी आडकाठी का घालते असा सवाल निर्माण झाला आहे. आम्ह्यला हीच शाळा हवी आहे, जर आमच्या मुली शिकल्या नाही तर याची जबाबदारी दाभोळ ग्रामपंचायतची असेल असं दाभोळमधील पालकांचं आहे. स्वतःचा विकास आणि आर्थिक गणित असल्यामुळे दाभोळ ग्रामपंचायतला शाळा नको आहे असं या पालकांचं म्हणणं आहे.

याबाबत आम्ही दाभोळ ग्रामपंचायतची भूमिका जाणून घेण्यासाठी दाभोळ ग्रामपंचायतचे सरपंच

राखी तोडणकर यांच्याजवळ संपर्क केला

“वर्क ऑर्डर असेल तरीही आम्ही काम करू देणार नाही कारण ही जागा दाभोळ ग्रामपंचायतची आहे. आम्ही याठिकाणी कोणतंही काम करू देणार नाही आम्ह्यला याठिकाणी हॉल किंवा वेगळा उपक्रम करायचं आहे. आम्ही त्या मुलींसाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. याबाबत ग्रामसभेचा एकत्र ठराव झाला आहे. त्यामुळे याठिकाणी कोणतंही काम होणार नसल्याचं”

सरपंच राखी तोडणकर यांनी सांगितलं.


समाजातील अनेक मुले या ठिकाणी शिक्षण घेतातच.

“श्रीमंत लोकांची मुलं इतर ठिकाणी शिक्षण घेतात, मात्र आमच्यासारख्या गरिबांच्या मुलांना ही शाळा आधार आहे. मात्र आज या शाळेची अवस्था खंडरसारखी बनली आहे. तिथे विद्यार्थी पाठवताना मनामध्ये धाकधुक होते. शिक्षणही महत्वाचा आहे मात्र त्यापेक्षा जीव जास्त महत्त्वाचा आहे”

असे सांगत या शाळेची दुरुस्ती करावी अशी मागणी दाभोळमधील पालकांनी केली आहे.

दापोली मतदारसंघातील सरकारी शाळांमध्ये शैक्षणिक सुविधा विकसित करणं. सैद्धांतिक शिक्षणाला प्रात्यक्षिक शिक्षणाची जोड देणं, शाळा, केंद्रीय विद्यालयं, कॉन्व्हेंट शाळांच्या धर्तीवर विद्यार्थ्यांच्या चित्रकला, गायन, वादन, क्रीडा अशा विविध कलागुणांना वाव मिळवून देणं. पाठ्यक्रम शिक्षणासोबत जीवनावश्यक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं.

विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमाबाहेरील शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं. शाळांना फिट इंडिया, स्वच्छ भारत, खेलेगा इंडिया, जितेगा इंडिया इत्यादी अभियानाशी जोडणं. योग्य करिअर पाथ निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणं हे आमदार योगेश कदम यांचंही तितकंच मार्गदर्शन असणं गरजेचं आहे. ग्रामीण भागात चांगले शिक्षण देण्याच्या दृष्टीने अनेक अडचणी येतात. मुलांची संख्या थोडी म्हणून शाळा काढता येत नाहीत आणि काढलीच तर एकाच शिक्षकाकडे सर्व इयत्ता सोपवाव्या लागतात.

खेड्यापाड्यांत जाण्यास शहरी शिक्षक नाखूष असतात. मुलींच्या शाळेकरिता शिक्षिका मिळू शकत नाहीत. हस्तव्यवसाय, विज्ञान, चित्रकला, गायन इ. विषयांचे खास शिक्षक मिळत नाहीत. तपासनीस आडगावी जाण्यास नाखूष असतात त्यामुळे देखरेख कमी राहते आणि शिक्षणाचा दर्जाही कमी असतो. समाज मागासलेला असल्याने तो शिक्षकावर गैरवाजवी हुकमत आणि अधिकार चालवितो.

इमारत, साधनसामग्री, ग्रंथालय, प्रयोगशाळा इ. शिक्षणाची साधने खेड्यात दुर्मिळ असतात. त्यामुळे अश्या नेक अडचणींचा सामना करावा लागतो आता दाभोळ ग्रामपंचायत आपल्या निर्णयावरती पुनर्विचार करणार की नाही हे पाहणं महत्व्याचं असणार आहे.

Response (1)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *