गुहागर : झोंबडी येथे महिला ग्रामपंचायत सदस्येला त्रास दिल्याचा आरोप, सामाजिक बहिष्कार आणि राजीनाम्यासाठी दबावाचा आरोप, थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

banner 468x60

गुहागर तालुक्यातील झोंबडी (तेलीवाडी) येथे एका महिला ग्रामपंचायत सदस्येला देवस्थानाच्या कारणावरून सामाजिक बहिष्कार टाकत मानसिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने रत्नागिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे.

तक्रारदार मयुरी महेश लांजेकर या सन २०२२ मध्ये वार्ड क्रमांक १ मधून बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी तेलीवाडी येथे पार पडलेल्या पारंपरिक पालखी उत्सवादरम्यान त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यात आले.

पालखी त्यांच्या घरी आल्यानंतर गुरवाने त्यांना ओटी भरणे, पालखीला नमस्कार करणे तसेच नारळ अर्पण करणे यास मनाई केली. “पालखीपासून लांब राहा” असे सांगून त्यांना बाजूला करण्यात आले. या घटनेमुळे समाजात बदनामी झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

तसेच, गेल्या सहा महिन्यांपासून काही व्यक्तींमार्फत सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यामध्य समीर सदानंद तावडे आणि संभाजी लांजेकर यांच्यासह काही जणांनी त्यांच्या घरात पालखी ठेवू नये, असा दबाव टाकल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याशिवाय, त्यांच्या पतीवर मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, देवस्थानाची जबाबदारी स्वीकारण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप आहे. “जबाबदारी घ्या अन्यथा ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा द्या,” असा दबाव टाकण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

या प्रकारामुळे तक्रारदार महिलेच्या आरोग्यावरही परिणाम झाला असून, यापूर्वी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागल्याचे महिलेनं म्हटलं आहे.


दरम्यान, संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर गुन्हा नोंद करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार महिलेने पोलीस प्रशासनाकडे केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *