रत्नागिरी : नाखरे येथे कार- दुचाकी अपघातात तरुण आंबा व्यावसायिकाचा मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील नाखरे गावात आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मयत तरुणाचे नाव चंद्रवदन शैलेंद्र शिंदे दसुरकर असे असून, तो नाखरे येथील रहिवासी होता.


मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रवदन हा पावस येथून आपल्या नाखरे येथील घरी दुचाकीवरून परतत असताना हा अपघात घडला. पावस ते नाखरे या रस्त्यावरील खांबडवाडी परिसरात त्याच्या दुचाकीची एका चारचाकी इको गाडीशी जोरदार टक्कर झाली. या टक्कर इतकी भीषण होती की, चंद्रवदनचा जागीच मृत्यू झाला.

विशेष म्हणजे, हा अपघात त्याच्या घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर घडला.
चंद्रवदन हा एक अष्टपैलू तरुण होता. त्याला ट्रेकिंगची आवड होती आणि तो एक यशस्वी आंबा व्यवसायिक म्हणूनही ओळखला जात होता.

त्याने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि नुकतेच एक महिन्यापूर्वी त्याचे लग्न झाले होते. नवविवाहित असलेल्या चंद्रवदनच्या अकाली निधनाने त्याच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *