गुहागर :आधुनिक तंत्रज्ञान व सुधारित बी-बियांने वापरून कोकणात सामुहिक शेती करणे एक उत्तम पर्याय

banner 468x60

उमराठ सरपंच जनार्दन आंबेकर

banner 728x90

पुर्वी कोकणात शेती करणे हाच एक पारंपारिक प्रमुख उद्योग धंदा होता. त्याच्या जोडीला आंंबा, काजू, नारळ, सुपारी कोकम इत्यादी फळबाग लागवड हा सुद्धा जोडधंदा सुरू झाला.

पुर्वी कोकणात एकत्र कुटुंब पद्धती होती. अजूनही आहे परंतु प्रमाण मात्र घटलेले आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत ओठा, माजघर, चौफेर पडव्या असे भले मोठी घरे असायची तसेच गाई-गुरांनी भरलेले गोठे तर घरी राखणदार कुत्रा आणि उंदरांपासून रक्षण करण्यासाठी मनीमाऊ सर्रास असायची.

घरची /शेतीची कामे सुद्धा वाटून (विभागून) दिलेली असायची. ते एक भरल्या घराचे वैभवाचे, समृद्धीचे आणि लक्ष्मीचे लक्षण मानले जायचे आणि कुटुंबितील सर्वच लहानथोर मंडळी आनंदात, सुखी- ममाधानात राहत होती. सर्व सण-उत्सव पारंपरिक आणि पद्धतशीरपणे उत्साहात साजरे व्हायचे.

त्यामुळे लहान मुलांवर संस्कार सुद्धा चांगले होत होते. आता सुद्धा आहेत परंतु पुर्वी पेक्षा फारच तफावत जाणवते आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती, बदलती शिक्षण पद्धती, काळानुसार बदलती जीवन शैली, नैसर्गिक आपत्ती तसेच कोकणात हवेतसे फारसे उद्योग धंदे उपलब्ध नसल्याने सहाजिकच तरूण पिढीचा नोकरी-धंदा, व्यवसायासाठी मुंबई, पुणे सारख्या शहरांकडे वाढलेली ओढ. परिणामतः ग्रामीण खेडेगावे सुद्धा ओस पडताना दिसत आहेत.

विभक्त कुटुंब पद्धतीमुळे ७/१२ वरील एकत्रित सामाईक शेती जागेची झालेली तुकडा वाटणी. शिवाय शेती, फळबागा करामचे झाली तरी वन्य प्राणी वानर, माकडे आणि उपद्रवी वन्य पशू रानडुक्कर, रानगवे यांचा त्रास.

शासनाच्या वन विभागाच्यावतीने वानर आणि माकडे संख्या गणती/ मोजण्याच्या अभियाना पलिकडे अजूनही ठोस पावले उचलताना दिसत नाहीत. एकत्र कुटुंब पद्धती कार्यरत असताना मनुष्यबळ चांगले असायचे. त्यामुळे सर्व प्रकारची शैती मोठ्या प्रमाणात केली जायची.

घरपरिसरातील शेती बरोबर सामुहिकरीत्या डोंगर भाग साफ करून शेती केली जायची. त्यावेळी डोंगर भागात खायला मिळत असल्यामुळे वानर, माकडे घर वस्तीकडे त्रास द्यायला फारसे येत नव्हते.

आता तर जंगलात खायला काही मिळत नसल्यामुळे वानर आणि माकडे घरांकडे, अगदी मानवी वस्तीकडे त्रास देताना दिसत आहेत. त्यांचे प्रजनन सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

शासनाच्या वन विभागाने यांची वेळीच दखव घेऊन उपाय-योजना / बंदोबस्त करणे आवश्यक आहे. नाहीतर कोकणातील शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना स्वसंरक्षणासाठी कायदा हातात घ्यावा लागेल अशी परिस्थिती दिसते आहे.

अशा सर्व परिस्थितीत आपली जमीन जागा पडीक कींवा ओसाड न ठेवता वाडी-गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सामुहिक शेती करणे हा एक सद्या उत्तम उपाय वाटतो. . पुर्वी पावसाळ्यात शेती करताना दोन/तीन घराणे मिळून डाळे असायचे आणि र्एकत्र येऊन एकमेकांची शेती करायची सर्रास पध्दत होती.

आताही तशाच पद्धतीने परंतु मनुष्यबळ कमी असल्यामुळे वाडी-गावातील शेतखरी ग्रुपने एकत्र मिळून सामुहिक शेतीतून येणारे उत्पन्न वाटणी करून घेतल्यास आणि ग्रुपने सामुहिकरित्या शेतीची रात्रंदिवस राखण केल्यास वानर, माकडे आणि वन्य प्राणी, पशू यांच्या पासून पिकांची राखण, शेतात मचाण बांधून करु शकतात.

पुर्वी बैल जोडीच्या नागराने शेतकरी शेतीची नांगरणी सर्रास करत असत. आता नागराची जागा ट्रॅक्टरने घेलीआहे. निश्चितच आधुनिक तंत्रज्ञान आणि तालुका कृषी विभागा कडून मिळणारे सुधारीत बी-बियांने वापरून शेती केल्यास भरघोक्ष पीक आपणाला घेता येईल.

त्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांनी शेती करताना आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बी-बियांने वापरून सामुहिक शेती करण्याच्या पद्धतीकडे वळावे असे आवाहन उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी केले आहे. – *जनार्दन आंबेकर, सरपंच, ग्रामपंचायत उमराठ*- मोबा. ८७६७४३३८४०.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *