राजापूर : जमिनीच्या वादातून महिलेला मारहाण

banner 468x60

कौटुंबिक जमीन आणि सामाईक घरावरून सुरू असलेल्या जुन्या वादामुळे राजापूर तालुक्यातील डोंगर दत्तवाडी येथे एक गंभीर घटना घडली आहे. सख्या जावेने रागाच्या भरात दुसऱ्या जावेच्या डोक्यात सोललेला नारळ मारून दुखापत केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एका महिलेविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही दुखापतीची घटना दिनांक ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता डोंगर दत्तवाडी, ता. राजापूर येथे घडली. याप्रकरणी संजिवनी संतोष कामतेकर (वय ४७, रा. डोंगर दत्तवाडी) यांनी राजापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी संजिवनी कामतेकर आणि आरोपी महिला या दोघी नात्याने सख्ख्या जाऊ आहेत आणि त्यांचे जमीन-जुमले तसेच सामाईक घरावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत.


घटनेच्या दिवशी फिर्यादी संजिवनी कामतेकर या त्यांच्या शेतातील काढलेले नाचणीचे गोडण सडण्यासाठी जुन्या घरातील ‘व्हाईनावर’ घेऊन गेल्या होत्या. त्याचवेळी आरोपी महिला तिथे उपस्थित होती. संजिवनी यांना पाहताच आरोपी महिलेने त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि ‘तू इथे कशाला आलीस, तुझ्या घरात जा’ असे बोलली.


यावर फिर्यादीने ‘तू मला शिव्या कशाला देतेस?’ असे विचारले असता आरोपी महिलेला अधिक राग आला. तिने रागाच्या भरात घरातील खोलीत धाव घेतली आणि तेथे असलेला सोललेला नारळ हातात घेऊन येऊन फिर्यादी संजिवनी कामतेकर यांच्या डोक्यात डाव्या बाजूला जोरदार मारला. यात संजिवनी कामतेकर यांना गंभीर दुखापत झाली. तसेच आरोपीने फिर्यादीला ठार मारण्याची धमकी देखील दिली, असे तक्रारीत नमूद आहे.


या घटनेची तक्रार राजापूर पोलीस ठाण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ११८(१), ३५२ (हल्ला), आणि ३५१(१) (इजा पोहोचवणे) अंतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक २०६/२०२५ नुसार गुन्हा नोंदवला आहे. जखमी फिर्यादी संजिवनी कामतेकर यांच्यावर उपचार सुरू असून, कौटुंबिक वादातून झालेल्या या गंभीर हल्ल्यामुळे दत्तवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *