चिपळूण : परशुराम घाटात रस्त्याला गेलेत तडे, ‘हे’ तीन मार्ग वाहतुकीसाठी बंद

banner 468x60

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Goa National Highway) परशुराम घाटात (Parashuram Ghat) नव्याने केलेल्या काँक्रिटीकरणाला जागोजागी तडे गेले असून, काही ठिकाणच्या भेगाही रुंदावल्या आहेत.

banner 728x90

याशिवाय घाटातील प्रत्येक टप्प्यावर दरडी कोसळल्या आहेत. एकेरी मार्गावर मोठ्या प्रमाणात डोंगराची माती आली असून, ती अद्याप हटवलेली नाही. त्यामुळे दुसऱ्या मार्गावरून वाहतूक सुरू आहे.

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

वाहतूकदारांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. परशुराम घाटात नव्याने केलेल्या काँक्रिटला २ जुलैला तडे गेले होते. त्या वेळी तडे गेलेल्या भागात सिमेंट भरून त्याची ताप्तुरती डागडुजी केली होती; मात्र गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात तडे गेलेल्या जागी भेगा पुन्हा रूंदावल्या आहेत.

तेथील काही भाग खचल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परशुराम घाट सुमारे ५.४० किलोमीटर लांबीचा असून, घाटात एकेरी मार्गावर काँक्रिटीकरणाचे काम पाऊस सुरू होण्याआधी पूर्ण केले. मात्र, दुसऱ्या मार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्याआधीच जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने काम थांबवण्यात आले.

त्यानंतर एकापाठोपाठ एक दरडी कोसळल्याने त्यात यंत्रणा गुंतली; मात्र आठवडाभरात झालेल्या पावसात डोंगराची माती मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आली आहे. एकेरी मार्गावरील प्रत्येक टप्प्यावर दरडी आल्याचे दिसून येत आहे. त्यातील भरावदेखील हलवलेला नाही. त्यामुळे आणखी दरड कोसळल्यास दुसऱ्या मार्गावर दगडगोठे व माती येण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे वाहतूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घाटातील लांबीपैकी १.२० किमी लांबी ही उंच डोंगररांगा व खोल दऱ्या असल्याकारणाने डोंगरकटाईनंतर या भागात जुलै महिन्यात दगड, माती अधूनमधून कोसळत आहे. परशुराम घाटातील दुसऱ्या मार्गावरदेखील जागोजागी तडे गेले असून काही ठिकाणी काँक्रिटीकरण खचले आहे.

त्यामुळे त्या-त्या ठिकाणचे तडे व भेगादेखील रुंदावत आहेत.परशुराम घाटातील चौपदरीकरणात सुरुवातीपासून अडथळा ठरलेला मध्यवर्ती ठिकाणचा कातळ फोडण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. या आधी दोन ब्रेकरच्या साहाय्याने कातळ फोडला जात होता; परंतु पावसामुळे धोका असल्याने एका ब्रेकरच्या साहाय्याने हळूहळू कातळ फोडला जात आहे.

काही दिवसांत कातळ फोडण्यात यश आल्यास दुसऱ्या मार्गावरील काँक्रिटीकरणाला वेग येण्याची शक्यता आहे. सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडवून दिली. तालुक्यातील चिंद्रवली येथे रस्ता खचल्याचे उघड झाले आहे. अन्य दोन रस्त्यांना भेगा गेल्याने तालुक्यातील तीन रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. आज चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *