चिपळूण : परशुराम घाटातील 22 कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीस

banner 468x60

पावसाळा सुरू होताच तहसील कार्यालयाने मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील २२ कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीस दिल्या आहेत.

पावसाळ्याच्या तोंडावरच केवळ नोटीस दिल्या जातात, सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या जात नाहीत, असा आक्षेप घेऊन ग्रामस्थांनी या नोटीस न स्वीकारता त्या परत पाठवल्या आहेत.

महामार्गावरील ३ किलोमीटर लांबीच्या परशुराम घाटातील डोंगर कटाईमुळे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पैढे आणि माथ्यावरील परशुराम गावातील ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात डोंगराचा भराव खाली आल्याने अनेक वेळा वाहतुकीसाठी घाट बंद केला गेला.

एका बाजूला परशुरामच्या घरांना धोका आहे, तर दुसऱ्या बाजूला दरीत असलेल्या पेढेतील घरांना धोका आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थ उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठपुरावा करीत आहेत.

मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परशुराम घाटातील चौपदरीकरणाची बहुतांशी कामे मार्गी लागली आहेत. ठिकठिकाणी संरक्षक भिंती उभारल्या असून काही ठिकाणी शिल्लक आहे. पावसाळ्यात येथे दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे.

पावसाळा सुरू होताच तहसील कार्यालयाने परशुराम येथील २२ ग्रामस्थांना स्थलांतराची नोटीस दिली आहे. महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी कोणतीही उपाययोजना झाल्या नाहीत. केवळ नोटीस देऊन शासन आपली जबाबदारी झटकत् असल्याने ग्रामस्थांनी बजावलेल्या नोटीस स्वीकारलेल्या नाहीत.

त्यामुळे आता प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. परशुराम घाटात नव्याने केलेल्या काँक्रीटला २ जुलै रोजी तडे गेले होते. यावरून निकृष्ट कामाचा नमुना समोर आला होता. त्यावेळी तडे गेलेल्या भागात सिमेंट भरून त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *