गुहागर : गणेश विसर्जनावेळी बुडणाऱ्या पाचजणांना वाचवले

banner 468x60

गुहागर येथील समुद्रकिनारी विसर्जनासाठी समुद्रात गेलेले पाच तरुण बुडत असताना गुहागर नगरपंचायतीच्या सुरक्षारक्षकांनी वाचवले.

banner 728x90

समुद्रात दोरखंड टाकून या सुरक्षारक्षकांनी या पाचजणांना वाचवले. ही घटना गुरुवारी सायंकाळी गौरी-गणपती विसर्जनाप्रसंगी घडली. गुहागर नगरपंचायतीचे आशिष सांगळे व जगन्नाथ घोरपडे या दोन सुरक्षारक्षकांमळे माठा अनर्थ टळला.

गुरुवारी १२ सप्टेंबरला सायंकाळी दुर्गादेवी वाडीतील गौरी- गणपतीची मिरवणूक दुर्गादेवी मंदिरासमोरील पाखाडीने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आली. भक्तिभावाने गौरी- गणपतीची समुद्रावर सामूहिक आरती झाली. त्यानंतर एकेकजण गणपतीची मूर्ती घेऊन समुद्रात विसर्जनासाठी जाऊ लागले.

गणेश मूर्तीचे विसर्जन करुन समुद्रातून परतत असतानाच पाच तरुण एका लाटेने खोल समुद्रात ओढले गेले. किनाऱ्यावरुन समुद्राचे निरीक्षण करणाऱ्या आशिष सांगळे, जगन्नाथ घोरपडे यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी तातडीने आपल्याकडील दोरखंडाला बोया बांधून तो खोल समुद्रात भिरकावला. समुद्रात अडकलेल्या तरुणांसाठी ती आयुष्याची दोरी ठरली.


प्रथम दोरखंडाला बांधलेला बोया दोघांच्या हाती लागला. आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेण्यासाठी या दोन तरुणांची धडपड सुरु होती. त्याचवेळी आणखी एक लाट आली आणि उर्वरित तीन सहकारीही बोयाच्या जवळ आले. पण तोपर्यंत बोयाला बांधलेला दोरखंड समुद्रात जाऊ लागला. किनाऱ्यावरुन दोरखंड ओढणारे चार पाच सहकारी जवळपास छातीभर पाण्यात लाटा झेलत उभे होते.

जीवनमरणाच्या हिंदोळ्यावरचा हा काही क्षणांचा खेळ किनाऱ्यावर उभ्या असलेल्या सर्वांचेच प्राण कंठाशी आणत होता. तितक्यातच आणखी १० – १२ जणांनी धावत जाऊन खोल समुद्रात जाणारा दोरखंड पकडला.

त्यानंतर सर्वजण किनाऱ्यावर सुखरुप परतले आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आशिष सांगळे व जगन्नाथ घोरपडे या दोन सुरक्षारक्षकांचा नगरपंचायतीने शुक्रवारी सत्कार केला.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *