रत्नागिरी : जिल्ह्यात इंधनाचा साठा मुबलक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचं आवाहन

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. इंधन दरात कोणताही बदल झालेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

banner 728x90 banner 728x90

मध्यपूर्व आशिया, अमेरिका, युरोपियन खंड तसेच आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी इंधनटंचाईबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच घाबरून जाऊन पेट्रोल पंप आणि सीएनजी स्टेशनवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून साठा व वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला. संबंधित कंपन्यांकडून नियमित आणि सुरळीत पुरवठा सुरू असल्याची खात्री देण्यात आली आहे.

सलग सुट्ट्या, होळी सण आणि पर्यटन हंगामामुळे काही पेट्रोल पंपांवर तात्पुरती गर्दी झाली असली तरी जिल्ह्यातील सर्व पंप आणि गॅस एजन्सींमधून इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *