चिपळूण : कौटुंबिक वादातून पुतण्यावर हल्ला

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील कळकवणे आयनाडवाडी येथे कौटुंबिक वादातून पुतण्यावर चुलत्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. दि. २३ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात दोन चुलत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सुबोध दत्ताराम शिंदे (वय ३२, व्यवसाय नोकरी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आणि त्यांची आई एकत्र राहतात, तर त्यांचे वडील दत्ताराम शिंदे गेल्या ३० वर्षांपासून वेगळे राहतात. फिर्यादीचे वडील हे त्यांच्या चुलते, चुलती आणि आजीसोबत एकत्र कुटुंबात राहतात. यातील आरोपी संतोष कृष्णाजीराव शिंदे आणि अशोक कृष्णाजीराव शिंदे हे फिर्यादीचे चुलते आहेत.

आरोपींनी फिर्यादीला त्यांच्या वडिलांच्या घरी येण्यास मनाई केली होती. दि. २३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता फिर्यादी सुबोध शिंदे हे आपल्या वडिलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले. त्यावेळी वडिलांनी त्यांना उद्देशून “तू इथे का आलास? तू माझा मुलगा नाहीस,” असे म्हणत शिवीगाळ सुरू केली.

याचवेळी फिर्यादीचे लहान चुलते संतोष शिंदे हे बाहेर आले आणि त्यांनी हातातील बांबूने फिर्यादीच्या खांद्यावर आणि अंगावर फटके मारण्यास सुरुवात केली. त्याचवेळी मोठे चुलते अशोक शिंदे यांनी फिर्यादीला हाताच्या थापडा आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

या हल्ल्यात फिर्यादीला गंभीर दुखापत झाली. गुन्हा दाखल या घटनेनंतर फिर्यादीने अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. दि. २८ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५:०३ वाजता गुन्हा क्रमांक २४/२०२५ नोंदवण्यात आला.

भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अंतर्गत आरोपी संतोष कृष्णाजीराव शिंदे आणि अशोक कृष्णाजीराव शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *